जंतर-मंतर आंदोलनाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट; 400 हून अधिक अकाउंट्सवर कारवाई: दिल्ली पोलीस

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन सुरूच आहे. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळाल्याचं दिसलं.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहित पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवला असल्याचं म्हटलं आहे.

त्यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा दावा दिल्ली पोलीसांनी केला आहे. तसंच फूड डिलिव्हरी अॅप्सवर बंदी घातलेली नसून ही माहिती दिशाभूल करणारी आहे असं म्हटलं आहे.

या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली मध्यचे डीसीपी रोहित राजबीर सिंह यांनी आंदोलनाशी संबंधित 400 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्सची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.

डीसीपी सिंह यांनी सांगितलं की, "एका राजकारण्याने रात्री सोशल मीडियावर व्हीडीओ पोस्ट करून केंद्र सरकार जंतर-मंतर येथील आंदोलनकर्त्यांवर कारवाईची तयारी करत असल्याचा दावा केला होता. या व्हीडीओमुळे जनतेमध्ये भीती, संभ्रम आणि घबराट निर्माण झाली. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशी कोणतीही कारवाई प्रस्तावित नसल्याचं स्पष्ट करत नागरिकांना अप्रमाणित दावे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं."

"तपासादरम्यान आंदोलनाशी संबंधित खोटी माहिती पसरवणारी काही सोशल मीडिया अकाउंट्स पाकिस्तानमधून चालवली जात असल्याचंही आढळल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणा अशा अकाउंट्सची ओळख पटवण्यासाठी काम करत असून आतापर्यंत 400 हून अधिक अकाउंट्स सापडली आहेत. ही अकाउंट्स एआय-निर्मित सामग्री, डीपफेक व्हीडीओ, संपादित छायाचित्रं आणि अन्य दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करत असल्याची माहिती त्यांनी दिली."

या आंदोलनादरम्यान 20 जुलै रोजी पोलिसांच्या कारवाईमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, हा दावा खोटा असल्याचं सांगत डीसीपी सिंह यांनी आंदोलनादरम्यान कोणाचाही मृत्यू झालेला नसल्याचं स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक पोस्ट, व्हीडीओ किंवा छायाचित्र सत्य आणि अचूक असेलच असं नाही, असं नमूद केलं. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची पडताळणी आणि तथ्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सीजेपीच्या बॅनरखाली गेल्या काही आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू असून, विशेषतः इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, त्याच माध्यमांवर आंदोलनाशी संबंधित अनेक खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या पोस्टही प्रसारित झाल्या असून त्याचा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली.

दिल्ली पोलीस सोशल मीडियावर सातत्याने लक्ष ठेवून असून फेक न्यूज, डीपफेक व्हिडीओ आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टबाबत जनजागृती करण्यासाठी अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून माहिती देत असल्याचं डीसीपी रोहित राजबीर सिंह यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या, नवी दिल्ली जिल्ह्यात अॅप-आधारित अन्न वितरण (फूड डिलिव्हरी) सेवांवर संपूर्ण बंदी घालण्यात आल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. ही माहिती वस्तुस्थितीला धरून नसून अत्यंत दिशाभूल करणारी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या चिंतेमुळे, दिल्ली वाहतूक पोलिसांनी अधिकृत वाहतूक सल्ला (ट्रॅव्हल अॅडव्हायजरी) जारी केला आहे. त्यामध्ये वाहनचालकांना अधिसूचित भागाकडे जाणारे मार्ग टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाहतुकीचं सुरळीत नियमन, कार्यात्मक व्यवस्थापन तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

अभिजीत दिपके पडले आजारी, व्हीडिओ शेअर करत दिली 'ही' माहिती

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली आहे.

अभिजीत दिपके यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हीडिओ शेअर करून माहिती दिली आहे.

अभिजीत दिपके म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती. आता माझ्या रक्त तपासणीचा अहवाल आला असून मला टायफॉइड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व कॉक्रोच आंदोलनकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो."

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्मला सीतारामन यांच्या 'पेपरफुटी'वरील वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक; नेमकं काय म्हणाल्या?

दिल्लीतील जंतरमंतर येथे मागील काही आठवड्यांपासून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन सुरू आहे.

देशभरातील तरुण आणि विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सातत्याने जेन झी पिढीशी आणि याच वयोगटातील आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

तर, दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेपफुटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

गुरुवारी (24 जुलै) सीतारामन यांनी म्हटलं होतं की, पेपरफुटीच्या घटनेमुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांना धक्का बसला. मात्र नंतर अनेकांनी अधिक मेहनत घेऊन आपल्या कामगिरीत सुधारणा केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपला हा अनुभव सांगितला असल्याचं त्या म्हणाल्या.

मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस, कॉकरोच जनता पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासह इतर अनेक पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

सीतारामन यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटलं होतं की, "सरकारने त्या घटनेनंतर वेळेत कारवाई केली नसती, वेळेत अटक झाली नसती, वेळेवर अटक केली नसती, पुनर्परीक्षा घेतली नसती आणि घटनेनंतर वेळेत निकाल जाहीर केला नसता, तर आज अनेक तरुणांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नसता. हे सर्व होत असताना काही तरुण स्वतः पुढे येऊन सांगत आहेत की, पेपरफुटी झाल्याने सुरुवातीला मला दुःख झाले होते. पण नंतर मी त्याचा फायदा घेतला, अधिक मेहनत केली. त्यामुळे माझी कामगिरी सुधारली आणि मला चांगले यश मिळाले. अनेक तरुणांनी या परिस्थितीशी दोन हात करून चांगलं यश संपादन केलं."

सीतारामन यांच्या या वक्तव्यावरून रान उठलंय. काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांचं हे विधान असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्याचं म्हणत टीका केली.

काँग्रेसने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "ज्या पेपरफुटीमुळे 21 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव गेला, ज्याच्या विरोधात लाखो तरुण आंदोलन करत आहेत, त्याच पेपरफुटीचे फायदे सरकार सांगत आहे. हे वक्तव्य म्हणजे मोदी सरकार पेपरफुटी रोखण्याबाबत गंभीर नसल्याचा पुरावा आहे. या सरकारने देशाची शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे."

आम आदमी पक्षानेही सीतारामन यांच्यावर टीका करत म्हटलं, "अर्थमंत्र्यांना परिचयाची गरज नाही. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आणि यावेळी त्या पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत."

झारखंड मुक्ती मोर्चाने देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पक्षाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, "पेपरफुटी हा कर्करोगासारखा गंभीर प्रश्न बनला आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार या कर्करोगाचा नायनाट करण्याचे काम करत आहे, पण दुसरीकडे भाजप पेपरफुटीचेही फायदे सांगत आहे."

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही यावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 'या तर्कानुसार तर देशातील सर्वच परीक्षा पेपरफुटीच्या माध्यमातून व्हायला हव्यात', असं रांका म्हणाले.

पंतप्रधान मोदींचा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा व्हीडिओ संदेश, काय म्हणाले?

गुरुवारी त्यांनी एक व्हीडिओ जारी करत तरुणांना आवाहन केलं होतं. या व्हीडिओत त्यांनी पेपरफुटीनंतर त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला. त्यानंतर, तसेच भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार आणखी कठोर उपाययोजना करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

त्यानंतर, काल 24 जुलै रोजी उशिरा रात्री आणखी एक व्हीडिओ शेअर करत त्यांनी तरुणाईशी संवाद साधला.

विशेष म्हणजे, या दोन्ही व्हीडिओमध्ये त्यांनी "हॅलो फ्रेंड्स" आणि "थँक यू फ्रेंड्स" अशा शब्दांत संवादाची सुरुवात केली.

शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी 'लोकांनी दिलेल्या सूचनांसाठी धन्यवाद' म्हणत आभार मानले.

याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सोशल मीडियाचा, विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी अधिक प्रभावीपणे जोडण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी काल 24 जुलै8 रोजी त्यांचं उपोषण सोडलं. वांगचूक यांचं उपोषण केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत संपुष्टात आलं. त्याचवेळी आंदोलकांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचे आरोपही होत आहेत.

जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथे 24 जुलैरोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. मुंबई, नागपूर येथे आंदोलक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेमध्ये सरकारनं आज (25 जुलै) दुपारपर्यंतचा वेळ मागितला असल्याची माहिती सीजेपीच्या प्रवक्त्यांनी काल दिली होती.

सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले म्हणाले, "कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून हटवेल, अशी आम्हाला आशा आहे.

तसेच, आत्महत्या केलेल्या NEET परीक्षार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देणे आणि विद्यार्थ्यांवरील एफआयआर व इतर कायदेशीर गुन्हे मागे घेणे या दोन मागण्यांना सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे", असं रांका यांनी सांगितलंgett.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा नसता, तरुणाईकडून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल, असं अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळावरून बोलताना म्हटलं.

सीजेपीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर जंतर मंतरवर उपस्थित आंदोलकांना याबाबत माहिती देण्यात आली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.